मुुंबई – राज्यातील वातावरणात हळूहळू बदल होत असून कुठे थंडीची चाहूल तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात पुन्हा येऊ घातलेले नवीन पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे राज्यात थंडीचा जोर वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात सध्या अस्तित्वात असलेले अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे उद्या ( दि. 17) चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
त्यानंतरच त्याचे नामकरण होवून परवा शनिवार सकाळी बांगलादेश किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. यामुळे दि. 19 ते दि. 23 नोव्हेंबरच्या पाच दिवसादरम्यान कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात काहीसे ढगाळ वातावरण राहणार आहे.
कमाल आणि किमान तापमानात काहींशी वाढ होवून वातावरणात ऊबदारपणा जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे सर्व असले तरी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्र अथवा चक्रीय वादळ निर्मिती शक्यतेतून नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही.