मंचर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचर शहराचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्याशी दूरध्वनीहुन थेट संवाद साधत मंचरमध्ये राबवित असलेल्या अभिनव उपक्रमांचे खास शब्दात कौतुक केले.
याबाबत बोलताना सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले की, आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः दूरध्वनीवरून मला फोन करून मंचर शहरातील परिस्थितीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन गावात विविध उपाय योजना राबविण्यात येत असल्याचे आदरणीय उध्दवसाहेब ठाकरे यांना आपण सांगितल्याचे दत्ता गांजाळे यांनी सांगितले. आज राज्यात इतक्या मोठ्या आव्हानांचा डोंगर समर्थपणे पेलताना राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याकडे व सरपंच पदावरील व्यक्तीकडे इतक्या आपुलकीने चौकशी केली, याबद्दल माझे मन अतिशय गहिवरून आले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1191824551157248/
महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सुमारे ४५,००० लोकसंख्या असलेल्या मंचर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही यासाठी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे व ग्रामपंचायत सदस्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने गावामध्ये नवनवीन भन्नाट व अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली.
सरपंच दत्ता गांजाळे यांनी सर्वप्रथम संपूर्ण गावामध्ये औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले. त्यानंतर गावातील जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा पुरवणारे औषध विक्रेते, किराणा, भाजीपाला, दूध, मांस विक्रेते आदींची यादी तयार करून सोशल मिडियाद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली. त्याद्वारे लोकांना आवश्यक वस्तूंची मोफत घरपोच सेवा सुरू झाली. मंचर शहरात महाराष्ट्र राज्यातला पहिला निर्जंतुकीकरण कक्ष स्थापन केला, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क शिल्ड देण्यात आले.
आठवडे बाजाराच्या दिवशी गावात गर्दी होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक प्रत्येक रविवारी कटाक्षाने मंचरकरांचा कर्फ्यु पळाला जातो. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने गावातील अंतर्गत रस्ते मर्यादित केल्याने गावातील वायफळ वाहतुकीवर नियंत्रण आणले. शिवभोजन थाळी या शासनाच्या उपक्रमात गावातील गरिबांना खिशातून द्यावे लागणारे नाममात्र शुल्कही सरपंच गांजाळे यांनी केंद्रचालकास अदा करून दिलासा दिला.
जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा पुरवणारे विक्रेते यांनीदेखील त्या त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. सरपंच दत्ता गांजाळे हे स्वतः फार्मासिस्ट असल्याने त्यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंचर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.
सरपंच दत्ता गांजाळे व ग्रामपंचायत सदस्यांनी मंचरमध्ये राबविलेल्या या अभिनव उपक्रमांची स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन मंचरकरांना सुखद धक्का दिला आहे. गावातील एकीच्या जोरावर व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोनाला गावात शिरकाव करू न देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार बरेच काही सांगून जातो.