CM Eknath Shinde – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे. यावर २४ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत न्यायालय सरकारचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल.
मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल. तसेच न्यायालयाने मांडलेल्या त्रुटी दूर कऱण्याचे काम वकिलांची फौज करेल. मला वाटतं मराठा सामाजाला न्याय मिळेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे म्हणाले, मागच्या मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे.
कायदा सुव्यवस्था, शांतता राहिली पाहिजे. सर्व जाती धर्मांना माझे आवाहन आहे की, सर्वांनी संयम राखावा. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणे ही जमेची बाब आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सर्वांची इच्छा आहे,
सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना मराठा आरक्षण मिळावे, असे वाटते. यासाठी आम्ही न्यायालयात ठोस बाजू मांडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज जरांगे म्हणाले.
त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.