पुणे – पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.
आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी सासवड, जेजुरी आणि वाल्हे येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी थांबा आणि नीरा येथील पालखी तळाला भेट देऊन प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी केली.
या दौऱ्यावेळी आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला आदी अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री म्हणाले…
वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा औषध साठा, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे.
पाण्याचे पुरेसे टॅंकर, जलस्रोत वेळोवेळी तपासणी करावी.
आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात
मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशी निवासव्यवस्था करावी.
प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या विचारात घ्यावी
पालखी मार्ग तसेच वारीच्यादृष्टीने प्रशासनाने योग्य नियोजन यंदादेखील केले आहे. वारी काळात वारकऱ्यांच्या सुविधेसाठी अधिकच्या मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. पाण्याच्या टॅंकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त