पुणे – महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 4 लाख 54 हजार थकबाकीदार वीजग्राहकांनी गेल्या 23 दिवसांमध्ये 579 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
गेल्या 1 एप्रिल 2020 पासून या ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरले नव्हते. मात्र, महावितरणकडून 1 फेब्रुवारीपासून वीज तोडण्याची कारवाई सुरू केल्याने तसेच कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी बील भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्याने हा बील भरणा वाढला आहे.
मंगळवार (दि. 23)पर्यंत पुणे जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 533 ग्राहकांनी 301 कोटी 91 लाख, सातारा- 59 हजार 265 ग्राहकांनी 51 कोटी 52 लाख, सोलापूर- 85 हजार 825 ग्राहकांनी 81 कोटी 22 लाख, कोल्हापूर- 78 हजार 909 ग्राहकांनी 84 कोटी 96 लाख व सांगली जिल्ह्यातील 60 हजार 563 ग्राहकांनी 60 कोटी 31 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व ग्राहकांनी गेल्या एप्रिल 2020 पासून प्रथमच वीजबिलाचा भरणा केला आहे.