– सोनम परब
रेल्वेत दररोज “छोटा भारत’ प्रवास करत असतो. हिंदी चित्रपटात देखील हीच रेल्वे कथानकात कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन महत्त्वाची भूमिका बजावते.
चित्रपटात अपघातावर फार कमी चित्रपट तयार झाले आहेत. यात सर्वप्रथम नाव डोळ्यासमोर येते ते 1980 च्या रवी चोप्रा यांच्या “द बर्निंग ट्रेन’चे. रेल्वेवर साकारणारा हा एकमेव चित्रपट होता. या चित्रपटाचे कथानक अपघातकेंद्रित होते. हॉलीवूडमध्ये या विषयांवर अनेक चित्रपट पाहवयास मिळतात. अर्थात हिंदी चित्रपटात रेल्वे हे आकर्षणाचे केंद्र राहिले आहे आणि कमी काळासाठी का होईना ते दाखविले गेले आहे.
सुपरफास्ट रेल्वे आणि कारस्थान
द बर्निंग ट्रेनमध्ये विनोद खन्ना, धर्मेंद्र, हेमामालिनी, जितेंद्र, परवीन बॉबी आणि डॅनी यासारखे मोठे कलाकार होते. चित्रपटाचे कथानक हे रुळावर पहिल्यांदा धावणाऱ्या सुपरफास्ट रेल्वेवर आधारित होते. त्याचा पहिलाच प्रवास कारस्थानच्या विळख्यात अडकतो आणि आग लागते. रेल्वेतील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यानुसार रेल्वेला सुरक्षितपणे यार्डात आणले जाते. पण हा चित्रपट लोकांना फार आवडला नाही.
प्लॅटफॉर्मवर आधारित कथानक
चित्रपटांत रेल्वेचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मग आदित्य चोप्राच्या “मोहब्बते’तील सुरुवातीचे दृश्य असो किंवा श्याम बेनेगल यांचा “मम्मोह’ या चित्रपटातील फरीदा जलाल यांचा हृदयस्पर्शी निरोप असो प्रत्येक ठिकाणी रेल्वेची उपस्थिती राहिली आहे. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी रेल्वे आणि त्याचा प्लॅटफॉर्म प्रेम, द्वेष, रहस्य, गुन्हा, मिलन-दुरावा याची साक्ष देणारी राहिली आहे. तसेच हास्य आणि अश्रू या भावनांचे मिश्रणही पाहवयास मिळते.
फाळणीच्या वेदना चित्रपट “गर्म हवा’ मध्ये पाहवयास मिळाल्या. नास्तिक चित्रपटातही फाळणीचे दु:ख दाखविण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला. सनी देओलचा “गदर: एक प्रेम कथा’ मध्ये फाळणीनंतरचे रेल्वेतील आणि प्लॅटफॉर्मचे दृश्य पाहून प्रेक्षकांचे मन हेलावले. त्याचवेळी सलमान खानचा “बजरंगी भाईजान’मध्ये याच रेल्वेला दोन देशांच्या संबंधाचे प्रतीक म्हणूनही दाखविले.
रेल्वेतील स्टंट ब्लॅक अँड व्हाइट जमान्यापासून 1934 मधील “तुफान मेल’ या चित्रपटात पहिल्यांदा रेल्वेत स्टंट दृश्य आणले होते. त्यात नादिया हंटर जेव्हा रेल्वेच्या छतावर खलनायकाला मारहाण करते तेव्हा सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्यांचे आवाज ऐकू आले. धावत्या रेल्वेतील स्टंटचे दृश्य दिलीपकुमार यांनी “गंगा जमुना’मध्ये साकारले. यातील रेल्वे दरोड्याचे दृश्य खूपच रोमांचकारी ठरले. सलीम जावेदने याच दृश्याला मोडतोड करून “शोले’ मध्ये आणले. बोनी कपूरचा “रुप की राणी चोरो का राजा’ यात चोरीचे दृश्य साकारले. याप्रमाणे जंजीर, दिवार, दो भाई, सन ऑफ सरदार, विधाता, द ट्रेन यात रेल्वेचा कौशल्याने वापर केला.
मथळ्यात रेल्वे
रेल्वेच्या नावावर अनेक चित्रपट तयार झाले. शम्मी कपूर आणि सुनील दत्त यांचा पहिला चित्रपट “रेल का डिब्बा और रेल्वे प्लॅटफॉर्म’ याचा उल्लेख करता येईल. याशिवाय “द ट्रेन’, “ट्रेन टू पाकिस्तान’, “द बर्निंग ट्रेन’, “तुफान मेल’, “चेन्नई एक्स्प्रेस’, “स्टेशन मास्तर’ आणि “एक चालीस की लास्ट लोकल’ अशी नावे पाहता येतील. बहुतांश चित्रपटात रेल्वेचा डबा हा नायक नायिका यांच्यातील खटके उडण्याचे ठिकाण राहिले आहे. एवढेच नाही तर थोडे आकर्षण आणि नंतर प्रेम बहरण्यासाठी देखील रेल्वेचा वापर केला आहे.
राजेंद्र कुमार यांचा “मेरे महेबुब’, जितेंद्र यांचा “मेरे हुजूर’, राजेश खन्ना यांचा “आराधना’पासून शाहरुख खानचा “चमत्कार’ आणि “चेन्नई एक्स्प्रेस’पर्यंत हीच परंपरा सर्व नायकांनी बजावली. पाकिजामधील रेल्वेतील दृश्य ऐतिहासिक ठरले. त्यात राजकुमार हा झोपेत असलेल्या मीनाकुमारीचे सुंदर पाय पाहून एक संदेश सोडतो. “आप के पांव देखे, बहुत खुबसुरत है. इन्हे जमीन पर न रखिएगा, मैले हो जायेंगे. हा संवाद अजरामर झाला. या चित्रपटातील गीत, “चलते चलते कोई’च्या शेवटी रेल्वेच्या शिटीचा अचूक वापर केला गेला आहे.
संस्मरणीय दृश्य
रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेत विरहाच्या वेदनापासून हृदय पिळवटून टाकणाऱ्या दृश्यात राज कपूर यांचा “तिसरी कसम’ आणि कमल हसनचा “सदमा’ कोणीही विसरू शकणार नाही. याप्रमाणे “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मध्ये अखेरच्या प्रसंगात धावणाऱ्या रेल्वेतील मिलनाचे दृश्य देखील प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणारे ठरले. “दो उस्ताद’ मध्ये राजकपूर आणि शेख मुख्तार हे रेल्वेमुळे एकमेकांपासून दूरावतात. “हेराफेरी’त सलीम जावेद यांनी त्याचीच नक्कल करत अमिताभ आणि विनोद खन्ना यांना मालगाडीच्या माध्यमातून दुरावल्याचे दाखविले.
देवानंद यांचे रेल्वे प्रेम
काही कलाकार असे आहेत की त्यांना रेल्वेबद्दल अधिकच प्रेम होते. देव आनंद देखील असेच कलाकार होते. त्यानी “जब प्यार किसी से होता है’ चित्रपटात “जिया हो जिया ओ जिया कुछ बोल दो’, “सोलवा साल’ मध्ये “है अपना दिल तो आवारा’ आणि “काला बाजार’ मध्ये “उपरवाला जानकार अनजान है’, असे म्हणत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जितेंद्र यांनी “मेरे हुजुर’मध्ये “रुख से जरा नकाब हटावो’,
राजेश खान्ना यांचे “आराधना’तील “मेरे सपनो की राणी कब आएगी तू’ आणि “अजनबी’मध्ये “हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले’ हे गाणे गायले. “अजनबी’मध्ये राजेश खन्ना हे स्टेशनमास्तर होते. शम्मी कपूरने “विधाता’मध्ये दिलीपकुमार यांच्यासमवेत रेल्वे चालकाची भूमिका बजावली. “हाथो की चंद लकिरो’ म्हणत रेल्वे पळवली. भारतीय सिनेमाचे रेल्वेशी अतूट नाते आहे आणि ते राहिले पाहिजे. अर्थात चित्रपट असो किंवा प्रत्यक्षात असो, रेल्वे कधीही रुळावरून घसरू नये, कारण ही घटना खूप वेदनादायी आहे.