तामिळनाडू- आंध्रप्रदेशची सीमा बंद
वेल्लोर – करोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुले देशभर लॉक्डाऊन असल्याने विविध ठिकाणी बांबूचे अडथळे उभारुन रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र, तरिही प्रसंगी हे बांबू पाडून वाहनचालक रस्ता काढत आहेत. म्हणून लॉकडाऊन काळात वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर वेल्लोर जिल्ह्यात दोन ठिकाणी चेक नाक्यावर चक्क 3 ते 7 फुटांच्या भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारची देशातील ही पहिलीच घटना आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य राज्यातील वाहनांना वेल्लोरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. वेल्लोरमधील सैनागुंता व पोन्नई या दोन ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चेक नाक्यांवर भिंती उभारण्याचे काम रविवारी सकाळपासून सुरू झाले आहे. पतथालपल्ली, परादारामी, सेरकाडू आदी चार ठिकाणचे तपासणी नाके मात्र, खुले ठेवण्यात आले असून, तेथून वाहनांना तमिळनाडूमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.
या मार्गाने वेल्लोरमध्ये येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. या भिंत बांधण्याच्या प्रकाराचे जिल्हा प्रशासनाने समर्थन केले असून, चुकार आणि खोडसाळ नागरिक, वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठीच हा पर्याय निवडल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.