नवी दिल्ली, दि. 24 (प्रतिनिधी) – प्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे यांना “पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार आज जाहीर झाला आहे. शिवाय, लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या “मयुरी’ या कोकणी भाषेतील कादंबरीलाही बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष 2022च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 22 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता बर्वे या उत्तम कवयित्री आणि बाललेखिका आहेत. “मृगतृष्णा’ आणि “दिवसाच्या वाटेवरून’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. “गंमत झाली भारी’, “झाडआजोबा’, “खारुताई आणि सावली’, “उजेडाचा गाव’ हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून “पियूची वही’ ही कांदबरी विशेष प्रसिद्ध आहे. याच कादंबरीवर आधारित “संगीत पियूची वही’ हे बाल नाट्यही त्यांनी लिहिले आहे. “अदितीची साहसी सफर’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. यासोबतच, त्यांनी विविध विषयांवर ललित लेखनही केले आहे.
बर्वे यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य भा.रा.तांबे पुरस्कार, इंदिरा संत योजनेंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार, विशाखा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.माडगूळकर पुरस्कार, अनन्वय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सासणे, प्रवीण बानदेकर आणि प्रेमानंद गजवी या साहित्यिकांचा परीक्षक मंडळात समावेश होता. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी 14 नोव्हेंबर 2022 या बालदिनी साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येईल.
“पियूची वही’ या कादंबरीची निवड
“पियूची वही’ विषयी
रोजनिशी लिहिण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे. या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींची होणारी ओळख हे “पियूची वही’ या कादंबरीचा विषय आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सुटीच्या दिवशी खिडकी रंगवायला घेते. त्यातून तिला तिचे जग आणि निसर्ग सापडतो. निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांच्या ओढीने पीयू आपले अनुभव लिहू लागली.