मुंबई – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. काल सोमवारी अजित पवार यांनी अचानक सासवड येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला जाण्याचा कार्यक्रम रद्द केला होता. त्यामुळे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिले होते.
याशिवाय एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. याबाबत ते राज्यपालांना यादी देणार असल्याचीही महत्वाची माहिती समोर आल्यानंतर राजकीय भूकंप होणार असल्याच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मला ऑपरेशन लोटसची जास्त शक्यता वाटते. काही आमदारांनी राजीनामा दिल्याने सभागृहातील सदस्य संख्या कमी होते. समीकरण बदलू शकतात. जे राजीनामा देऊन बाहेर पडतील, त्यांना मंत्री होता येत नाही. पक्षांतर बंदी कायद्यातून गेलेल्यांना मंत्री होता येत नाही. हे कोण करू शकतं, ज्यांना राजीनामा दिल्यावर निवडून येण्याची खात्री असते. पण तो 40 आकडा होईल का असं मला वाटत नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपसोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले ?
परंतु, या सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. शरद पवार म्हणाले की, “सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही.”
“यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे. त्यानंतर रात्री मुक्कामाला मी मुंबईला जाणार आहे. मी वर्तमानपत्रात वाचलं की आमदारांची बैठक आहे वगैरे. 100 टक्के ही खोटी गोष्ट आहे. अशी कोणतीही बैठक नाही. पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. अजित पवारही याच कामात आहेत. याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी कुणावरही नाही. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करतोय. मी या सगळ्यावर स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही”, अशी कडक प्रतिक्रिया यावेळी शरद पवार यांनी दिली आहे.