लंडन – द वॉल राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर त्याचा वारसदार समजला जात असलेला तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा सातत्याने अपयशाचा धनी होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावातही त्याला मोठी खेळी करता आला नाही. आता भारतीय संघाच्या या भिंतीला तडे जात असल्याचे स्पष्ट दिसत असून आता त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले आहे.
श्रीलंकेवरून इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या सूर्यकुमार यादव किंवा पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाला उर्वरित कसोटींसाठी संघात स्थान मिळण्याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळे पुजाराची कसोटी कारकीर्दच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
पहिल्या कसोटीत पहिल्या डावात अवघ्या 4 धावांवर बाद झालेला पुजारा या कसोटीतही 23 चेंडूत 9 धावा करून परतला. पुजाराने 2019 सालच्या जानेवारीत अखेरची शतकी खेळी केली होती. ही खेळी करताना त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटीत 193 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या पुजाराने गेल्या 23 डावांत केवळ 552 धावा केल्या असून त्याची सरासरी 25 इतकी सुमार राहिली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने चांगल्या खेळी केल्या. मात्र, मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले होते. गेल्या 10 डावांत धावांची पंचवीशीही त्याला पार करता आलेली नाही. या डावांत त्याची 21 सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने 8, 15, 4, नाबाद 12 आणि 9 अशी धावसंख्या केली आहे.
भारतातही अपयशी
भारतात झालेल्या सामन्यांतही त्याला चमक दाखवता आली नव्हती. यंदाच्या वर्षी भारतातच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने 73 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर 15, 21, 7, 0 आणि 17 असे त्याचे अपयश समोर आले. त्यामुळेच या कसोटीत दुसरा डाव त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून याही डावात त्याला अपयश आले तर संघातील त्याची जागाही तो गमावून बसणार आहे.