कोलकता – भाजपविरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसंगी तृणमूल कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याची तयारी माकपने दर्शवली आहे. मात्र, तृणमूलशी पश्चिम बंगालमध्ये कुठला समझोता करण्यास त्या पक्षाने स्पष्ट नकार दर्शवला आहे.
राष्ट्रीय स्तरावर विरोधकांनी एकत्र यावे, असा सूर जोर धरू लागला आहे. त्याचा संदर्भ घेऊन येथे पत्रकारांनी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना डावे पक्ष तृणमूलबरोबर जाणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर ते उत्तरले, तृणमूलकडून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होतात.
त्यामुळे बंगालमध्ये त्या पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, राष्ट्रीय स्तरावर भाजप हाच विरोधी पक्षांचा प्रमुख राजकीय शत्रू आहे. भाजपशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. तो पक्ष भारताची राज्यघटनाच मोडीत काढू पाहत आहे.
भारतीय संकल्पनेसाठीच तो पक्ष सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर धर्मनिरपेक्ष विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या प्रयत्नांत आमचा सहभाग कायम असेल, असे म्हणत त्यांनी तृणमूलबाबत अनुकूलता दर्शवली. केरळमध्ये डाव्या पक्षांचा राजकीय लढा कॉंग्रेसविरोधात आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावर आम्ही भाजपविरोधात लढत आहोत, याकडेही येचुरी यांनी लक्ष वेधले.