– दीपेश सुराणा
पिंपरी – सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे. कोविडनंतर हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बऱ्याच जणांना हृदयविकाराच्या झटका येणे,अर्धांगवायूचा आजार जडत असल्याचे आढळत आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुबी एलकेअरमध्ये गेल्या दोन वर्षात 118 जणांवर हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर, 3001 जणांवर उपचार करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, जगात होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी 16 टक्के मृत्यूसाठी हृदयरोग हे प्रमुख कारण मानले आहे. वर्ष 2000 पासून, मृत्यूंमध्ये सर्वात मोठी वाढ ही हृदयरोगासाठी झाली आहे. 2019 मध्ये 2 दशलक्षांहून अधिक वाढून 8.9 दशलक्ष मृत्यू या विकाराने झाले आहेत.
हृदयविकार हा मुळात हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकार आहे. रक्तवाहिन्यांमध्ये चरबीसारखे पदार्थ साठल्याने रक्तप्रवाहात अडथळा येतो. त्यामुळे हृदयाचा संबंधित भाग निकामी होतो. रक्तवाहिन्यांचा हा विकार केवळ हृदयापुरता मर्यादित नाही. तो शरीरातील अन्य कोणत्याही अवयवात होऊ शकतो. मेंदुच्या रक्तवाहिन्यात चरबी साठल्यास पॅरालिसिसचा (अर्धांगवायू) झटका येऊ शकतो.
वायसीएम-रुबी एल केअरमध्ये हृदयविकाराचा आजार असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया, औषधोपचार केले जात आहेत. येथे शहरातील व शहर हद्दीबाहेरील रुग्ण देखील उपचारासाठी येतात. 2019-20 आणि 2020-21 या दोन आर्थिक वर्षात एकूण 118 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर, 3001 रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. चालू वर्षी एप्रिल ते जुन या महिन्यात कार्डियाक सेंटर बंद होते. त्यामुळे अपेक्षित शस्त्रक्रिया होऊ शकल्या नसल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप कनोज यांनी दिली.
हृदय जपण्यासाठी काय कराल?
दमछाक होईल असा कोणताही व्यायाम टाळा.
मानसिक ताणतणाव, अनावश्यक चिंता नको.
र नियमित योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करणे हितकारक
चालणे, सायकल चालवणे, पोहणे हे व्यायाम करावे.
वाजवीपेक्षा अधिक तेल, तूप, लोणी यांचे सेवन टाळावे.
काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो यांचा आहारात समावेश करावा.
नियमित दही, ताक, एखादे फळ खावे.