नगर, (प्रतिनिधी) – भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात ९ एप्रिल दरम्यान वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी घ्यावी काळजी-मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.
वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, दुचाकीपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मजवळ थांबू नये. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असस सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकर्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस ठाणेशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्षातील, दुरध्वनी क्र.१०७७ (टोल फ्री), ०२२४-२३२३८४४ वा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासमार्फत करण्यात आले आहे.