सातारा – जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची 15 टक्के उपस्थिती ठेवण्यात आली असून अभ्यागतांना प्रवेश बंदी आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच येण्यास परवानगी असून मंगळवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रवेशद्वारावर थांबून कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राची तपासणी करुन त्यांना प्रवेश दिला. सीईओंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकारी, कर्मचारी चांगलेच गांगरुन गेले.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये वर्षभरात आठशेच्यावर बाधित आढळले होते. 17 जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारीपासून करोनाचा कहरच सुरु झाला आहे. दोन दिवसांपूर्वी विविध विभागांतील पाच जण बाधित आढळून आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणखी सतर्क झाले आहे. कर्मचाऱ्यांची 15 टक्के उपस्थिती व अभ्यागतांना प्रवेश बंद केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागात शुकशुकाट आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी शंभर टक्के उपस्थित राहत आहेत. विविध विभागांत बाधित आढळल्याने मंगळवारी सकाळी विनय गौडा यांनी मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासून मगच त्यांना आत सोडले. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासणी करत असल्यामुळे अनेकांना धडकी भरली. प्रवेशद्वारावर गौडा यांच्याबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत आदी ओळखपत्रांची तपासणी करत होते.
जिल्हा परिषद कार्यालयात काही विभागांत बाधित आढळल्याने प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ई टपाल प्रणाली सुरू केली. कार्यालय आणि परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय सर्व विभागातील दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. सद्य परिस्थितीत 15 टक्के उपस्थितीत कार्यालये चालणे गरजेचे आहे. बाधितांची संख्या वाढल्यास करोना उपाययोजनांमध्येही अडचणी येण्याचा धोका असल्याने प्रशासनाने काही ठोस निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे.
– विनय गौडा (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा)