मुंबई – करोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे संपूर्ण देश दहशतीखाली आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्याने देखील करोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाइन्स जारी केल्या.
त्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र लिहिले आहे. 30 नोव्हेंबर रोजी राज्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सवाल उपस्थित केले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरीता राज्य सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप आहे. ओमायक्रॉनसंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना, सुधारीत नियम लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या मार्गदर्शक सूचना इतर राज्याच्या गाईडलाइन्सशी साधर्म नसल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
केंद्राने म्हटले की, राज्यांचे नियम केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे राज्याने आपले नियम केंद्राच्या निर्देशाप्रमाणे करावेत. जेणेकरून देशभरात एकसारखे नियम लागू करता येतील. तसेच प्रवाशांची गैरसोय करणारे राज्याच्या नियमांमध्ये बदल करावेत. राज्याने त्यांचे स्वतंत्र नियम लावू नये. यामुळे देशभरात एकसारखे नियम लागू न होता प्रवाशांची गैरसोय होईल, असे म्हटले आहे.