पुणे – राज्यातील विविध भागांतून धावणाऱ्या मध्य रेल्वेने गुरुवारी (5 नोव्हेंबर) 70 व्या वर्षात पदार्पण केले. तत्कालीन “ग्रेट इंडियन पेन्सिन्सुला’ची उत्तराधिकारी असणाऱ्या मध्य रेल्वेचा आजमितीस सुमारे 4 हजार अधिक किलोमीटरपर्यंत विस्तार झाला असून, पाच विभागांत 466 स्थानकांचे जाळे पसरले आहे. या वर्धापन दिनानिमित्त मध्य रेल्वेचे मुख्यालय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विद्युत रोषणाई केली होती.
आशियातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी धावली. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. तर बोरी बंदर येथील स्थानकांत नागरिकांची गर्दी होती. बॅन्ड वाजविण्यात आला, सलामी देण्यात आली. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तीन इंजिनासह गाडी लाकडी स्थानकातून बाहेर पडली.
सध्या मध्य रेल्वेचे 5 विभाग आहेत. पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागांत 466 स्थानकांचे नेटवर्क आहे. सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतून 4 हजार 151.93 किलोमीटर इतका रेल्वेमार्गाचा विस्तार झाला आहे.
दररोज अंदाजे साडेचार दशलक्ष प्रवासी वाहून नेणारे जगातील सर्वात मोठे उपनगरी नेटवर्क आहे. करोना कालावधीत मध्य रेल्वेने देशाच्या विविध भागांत पुरवठा साखळी सुनिश्चित करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.