सहकारनगर (हर्षद कटारिया)- तळजाई टेकडीवर “ऑक्सिजन’ फक्त शनिवारी व रविवारी मिळतो, असा गैरसमज नागरिकांना झाला असल्याची थट्टा काही पर्यावरण तज्ज्ञ करतात. कारण, सुट्टीच्या दिवशीच टेकडीवर तुडुंब गर्दी होत आहे. “विकेंड’ला तळजाई वनक्षेत्रात “जत्रा’ भरत आहे. या जत्रेला “कॉर्पोरेट लुक’ येण्यासाठी की काय? टेकडीवर विकासाच्या नावाखाली सिमेंटीकरण होत असून पर्यावरण प्रेमींकडून याला विरोध होत आहे. टेकड्यांवरील नैसर्गिक “वन उद्यान’ करण्याच्या नावाखाली वनविभागाकडूनच विद्रूपीकरणच सुरू आहे, वनविभाग, पालिकेने येथे होणारे अनावश्यक खर्च टाळले पाहिजेत, असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तळजाई टेकवडीचे वनविभागाकडून संवर्धन होणे अपेक्षित असताना वनउद्यानाच्या नावाखाली टेकडीवर ध्यान केंद्रे, पॅगोडा, जंगलातील वाटांवर बसण्यासाठी सिमेंटचे बाक बांधले जात आहेत, सिमेंटच्या कमानी बांधल्या जात आहेत, डांबरीकरण, सिमेंटचे ब्लॉक, जेसीबीचे काम यातन नैसर्गिक साखळीला बाधा येत आहे.
टेकडीवर सुशोभीकरणच्या नावाखाली सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. टेकड्यांवर सिमेंटीकरण, पेव्हर ब्लॉक, डांबरीकरण यामुळे पावसाळ्यात पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलाची शक्यता आहे. जो नौसर्गिक प्रवाह आहे त्यामध्ये बदल होऊन डोंगर बोडके होऊन दगड निखळण्याचीही शक्यता आहे. पावसाळ्यात मातीत पाण्याचा निचरा होतो. पाणी मुरते. मात्र, सिमेंटीकरण व डांबरीकरणामुळे पाण्याचा निचरा पूर्णतः थांबतो. दिवसभर सिमेंट उष्णता शोषते व रात्री उष्णता बाहेर फेकली जाते, यामुळे सदर परिसरात तेथील वन्यजीवांच्या अधिवासालाही धोकाच आहे.
टेकड्यांवर मानवी अधिवास “लिमिटेड’ ठेवणे गरजेचे आहे. निसर्ग संवर्धन करण्याबाबत आपण सर्वांनी सतर्क होणे गरजेचे आहे. त्यामुळे टेकड्यावर नैसर्गिक अधिवास वाचविण्यासाठी विकासाच्या नावाखाली होणारे सिमेंटीकरण पूर्णतः बंद झाले पाहिजे.
– गुरुदास नुलकर, पर्यावरण तज्ज्ञ