कोपरगाव (प्रतिनिधी) – मकरसंक्रांत निमित्ताने देशात काही ठिकाणी तर महाराष्ट्र राज्यात पतंगबाजी करुन उत्सव साजरा केला जातो. आपलाच पतंग दिर्घकाळ हवेत रहावा या स्पर्धेतून गत १२-१५ वर्षीपासून पासून नायलॉन धागा वापरण्यास पतंगोत्सव काही प्रेमींनी सुरुवात केली.याचे गंभीर परिणाम मनुष्य,पशू-पक्षी यांना गंभीर शारीरिक इजा पोहचण्यास सुरुवात झाली.अनेक पक्षी-पशू आणि काही मनुष्यांना जीवही गमवावा लागला आहे.पतंगबाजीत पारंपरिक साधा धागा वापरुन मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले आहे.
पतंगबाजीत नायलॉन धागा बंदी राज्यातील अनेक नागरिक तसेच पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके हे अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.याबाबत त्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार तत्कालीन प्रसंगी नायलॉन विक्रेते तात्पुरती कारवाई संबंधितांवर झाली होती.परंतू कायम स्वरुपी उपाय व्हावा म्हणून पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना नायलॉन धागा (मांजा) प्रतिबंधात्मक कारवाई व बंदी घालण्यासाठी पत्र पाठवले होते.
या बाबत मुख्यमंत्री यांनी दखल घेतली असून या संदर्भात पर्यावरण विभागाला कळवले आहे.तसेच राज्यात प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्यात आली असून नासिक विभागीय आयुक्तांनी नासिक, जळगांव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, महापालिका आयुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नायलॉन धागा विक्रेते यांचेवर कारवाई बाबत सुचना दिल्या आहेत.
पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात १) नायलॉन धागा (मांजा) उत्पादक कारखाने व विक्रेते यांचेवर बंदी आणून त्याचा उपयोग योग्य कारणासाठीच होणे कामी विशिष्ट नियमावली आखून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर पालन व्हावे.२) तातडीचा उपाय म्हणून राज्याचे मा.मुख्य सचिव, नगरविकास सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक,
वन व पर्यावरण विभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक होवून राज्यात छुप्या मार्गाने वितरित असलेला नायलॉन धागा जप्त करून संबंधितांवर कारवाई व्हावी.३) महाराष्ट्र शासना मार्फत पतंग उत्सवा दरम्याने साधा धागा वापरण्याचे आवाहन करून पतंगावर स्वच्छता अभियान, ओला- सुका-घरगुती घातक वर्गीकरण, पाणी वाचवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ,झाडे लावा – झाडे जगवा.
असे सामाजिक संदेश देण्याचे आवाहन नागरिकांना करावे.जेणे करून सामान्य नागरिकांना उत्सवाचा खरा आनंद घेता येईल. आपण या बाबत दखल घेवून मनुष्य, पशू-पक्षी यांना होणाच्या हानी पासून परावृत्त कराल अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली होती.याबाबत नायलॉन धागा विक्रेते यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु झाली आहे.