नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या कॅबीनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकार या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेत प्रस्ताव मांडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करण्याबाबत उल्लेख केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर त्यांचे लग्न योग्य वेळी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले होते.
सध्याच्या कायद्यानुसार, देशातील पुरुषांसाठी लग्नाचे किमान वय 21 आणि महिलांचे 18 वर्षे आहे. सरकार आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी लग्नाचे वय वाढविण्याचा विचार करत आहे. याशिवाय बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सरकार सुधारणा करणार आहे.