लखनौ – देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएएच्या विरोधात निदर्शने सुरू असली तरी हा कायदा मागे घेतला जाणार नाही असे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. आज येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की या कायद्याविषयी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम विरोधकांनीच चालवले आहे. पण सरकार आपल्या निर्धारापासून हटणार नाही असे त्यांनी यावेळी नमूद केले. अयोध्येत येत्या तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले जाईल अशी घोषणाहीं त्यांनी यावेळी केली.
सीएएच्या संबंधात बोलताना त्यांनी सांगितले की या कायद्यामुळे कोणाचेही नागरीकत्व जाणार नाही. त्यामुळे या विषयी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमुल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने चालवलेली मोहीम खोटेपणाची व दिशाभुल करणारी आहे. हा नागरीकत्व प्रदान करणारा कायदा आहे असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. सीएए कायद्याचे समर्थन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत अमित शहा बोलत होते. कॉंग्रेस वोट बॅंकेच्या राजकारणामुळे अंध झाली आहे असा आरोप करून त्यांनी देशाच्या फाळणीला कॉंग्रेस पक्षच जबाबदार असल्याचा आरोप केला.