रायगंज (पश्चिम बंगाल) – आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपा देशभर समान नागरी कायदा अर्थात सीएए लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. पण मी जिवंत असेपर्यंत राज्यात सीएए लागू होऊ देणार नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज येथे एका सार्वजनिक वितरण कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपा निवडणुकीपूर्वी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स आणि सीएए अर्थात समान नागरी संहितेबद्दल बोलत आहे. हे राजकारणाशिवाय दुसरे काही नाही. राज्यघटनेने प्रत्येकाला नागरिकत्व दिले आहे आणि सीमाभागातील लोकांना सर्व काही मिळत आहे. ते नागरिक आहेत, म्हणूनच ते मतदान करतात.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी हे स्पष्ट करते की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी पश्चिम बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शंतनू ठाकूर यांच्या नुकत्याच केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना बॅनर्जी यांनी ही माहिती दिली.
एका आठवड्यात संपूर्ण देशात सीएए लागू होईल, असे ठाकूर म्हणाले होते. रविवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील काकद्वीप येथे जाहीर सभेदरम्यान दिलेल्या ठाकूर यांच्या विधानामुळे वादग्रस्त कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चिंता वाढली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2019 मध्ये सीएएला मंजुरी दिली होती. 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची कायद्यात तरतूद आहे.