मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असून, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रो ट्रेनमधून प्रवास केला. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या लोकार्पण सोहळ्यास सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असल्याचं दिसून आलं. यावेळी शेतकऱ्यांनी वावी येथे समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवत आपला विरोध दर्शविला.
राज्य सरकारने समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण करून उद्घाटन करणे आवश्यक होते. समृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शेतांमध्ये जायला रस्ते नाहीत, पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये शिरते, समृद्धी ठेकेदाराच्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. यावर तोडगा काढणे अपेक्षित असताना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर्लक्षित करण्यात येत आहेत. असं यावेळी सांगण्यात आलं आहे.
स्वराज्य पक्ष, छावा संघटना, शेतकरी संघटना आदी संघटनांच्या माध्यमातून एकत्र येत यावेळी काळे झेंडे दाखवत विरोध दर्शविण्यात आला तसेच शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023पर्यंत खुला करण्यात येणार आहे.