विजय शेंडगे
कवीने काय लिहावं? कसं मांडावं? कोणती रुपकं वापरावीत? उपमा कशा वापराव्यात? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे कोणी काहीही लिहू शकतो. परंतु देवा झिंजाड विचारपूर्वक लिहितात. त्यांच्या “सगळं उलथून टाकलं पाहिजे’ या काव्यसंग्रहातील स्त्रीवरील अन्यायाची, सामाजिक विषमतेची, गरीब श्रीमंतीतल्या भेदाची प्रचंड चीड दिसून येते.
शेतकऱ्यावरील अन्यायाची, स्त्री शोषणाची, स्त्री मुक्तीची, सेक्युलॅरिझमची कविता लिहिली की पुरस्कारासाठी तिचा प्राधान्याने विचार होतो. त्यामुळे अलीकडचे साहित्यिक असेच विषय घेऊन शब्द भरडत राहतात आणि त्यातून केवळ साहित्यरूपी भरडा हाती येतो.
देवा झिंजाड यांची कविता म्हणजे भरडा नाही. तिला एक दर्जा आहे. त्यांच्या मनोगतात ते म्हणतात- “नागर, ग्रामीण, विद्रोही अशी कवितेची वाटणी मला मान्य नाही.’ परंतु त्यांच्या काव्यसंग्रहातील कविता मात्र त्याच मळलेल्या वाटेने जाताना दिसते.
“चुंबळ’, “ऊर ओरबाडलेल्या असंख्य नद्या’, “निर्भयाच्या यादीत’, “लिंगशुचिता’, “वस्रहरण’ या कवितांचा विषय स्त्री शोषण आहे. “मॅक्डोनाल्ड जातीच्या जिभा’, “अगतिकीकरण’, “कोरडी बेटं’, “रिबॉकच्या जातीचे पाय’ या कवितांमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथांवर आणि शहरी-ग्रामीण दरीवर भाष्य केले आहे. असे विषय मांडण्यासाठी जी विद्रोहाची भाषा लागते त्या भाषेचा कवीने चपखल वापर केला आहे आणि त्यामुळेच हा काव्यसंग्रह काहीसा एकसुरी झाला आहे.
असं काहीही असलं तरी आनंद देणाऱ्या काही जागा या काव्यसंग्रहात नक्की आहेत. कवी समाजातील दांभिकतेवर टीका करताना कोणाचीही भीडभाड बाळगत नाही. साहित्यक्षेत्रातील अनागोंदीवर भाष्य करताना “त्याच त्याच कविता’ या कवितेत कवी म्हणतो-
त्याच त्याच कविता ऐकून
जीव आलाय कानात
अन उद्या एखादी नवीन कविता ऐकायला
कवींना नेऊन हाणावे लागेल रानात
विद्रोहाची, संतापाची भाषा या काव्यसंग्रहात प्रत्येक पानात भेटते.
“कोरडी बेटं’ या कवितेत कवी म्हणतो-
दुष्काळ काय येतो जातो
पण आकाश वापरून
मातीच्या कुशीत निजणाऱ्या माणसांना
गाव कधीच होऊ देत नाही स्थलांतरित
कवीकडे सामाजिक निरीक्षणाचं आत्मभान आहे. सामाजिक दांभिकतेवर भाष्य करण्याची हिंमत आहे. वेगळ्या वाटा धुंडाळण्याची कुवत आहे. याची ओळख या कविता करून देतात हे मात्र नाकारता येणार नाही.