लखनौ, – ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (एसबीएसपी)आपले भारतीय जनता पक्षाशी असणारे संबंध तोडलेले आहेत. त्यामुळे अनुप्रिया पटेल यांच्या नेतृत्वाखालील अपना दल (सोनेलाल)ने या निवडणुकीत भाजपाकडे सन्मानजनक जागांची मागणी केली आहे. तशीच मागणी भाजपाचा आणखी एक साथिदार निशाद पक्षाने व्यक्त केली.
समाजवादी पक्षाला मिळत असणाऱ्या जनतेच्या वाढत्या पाठींब्याच्या पार्श्वभूमीवर बाहु सरसावलेल्या सहकारी पक्षांचे समाधान करण्याचे मोठे आव्हान भाजपापुढे असणार आहे.
एसबीएसपीने गेल्या विधानसभा निवडणुकीत आठ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्या जागांवर या पक्षांनी हक्क सांगितला आहे. 2017 च्या निवडणुकीत अपना दल (एस)ने 11 जागा लढवल्या होत्या. त्यातील नऊ जागांवर विजय मिळवला. तर एसबीएसपी या पक्षाला राजभर समाजाचा पाठींबा असून त्यांनी चार जागांवर विजय मिळवला होता.
या वेळी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याची मनिषा धरून केंद्रातील मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असणाऱ्या पटेल यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशात सभा आणि मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे.
इतर मागास, अनुसुचित जाती जमाती आणि उच्च जातीयांमध्ये पक्षाची स्वीकाराहर्ता वाढली आहे. आम्ही पक्ष संघटन वाढवले आहे. आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकल्या आहेत. सध्या आम्ही 200 जागा लढवण्याची तयारी केली आहे. 2
00 मतदारसंघात आम्ही निरीक्षक नेमले आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते राजेश पटेल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मात्र, अंतिम निर्णय दोन्ही पक्ष जागा वाटपाच्या चर्चेला बसतील तेंव्हा घेण्यात येईल. भाजपाकडून अपना दल (एस) ला ज्या काही जागा जागा मिळतील तेथे आम्ही लढू. अखेर युतीचा विजय अधिक महत्वाचा आहे.
नऊ आमदार असणाऱ्या या पक्षाला राज्यातील योगी सरकारमध्ये एक मंत्रीपद आणि दोन महा मंडळाची अध्यक्ष -उपाध्यक्ष पदे मिळाली आहेत. अनुप्रिया पटेल आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आशीष पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते अमित शहा आणि त्यांचे सहकारी आणि पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांची नुकतीच भेट घेतली. मात्र या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली नसल्याचे पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, निशाद पक्षाचे प्रमुख संजय निशाद यांनीही प्रधान यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र याही भेटीत जागा वाटपावर तोडगा निघाला नाही मात्र आम्ही निवडणूक लढवण्याबाबत ठाम आहोत, असे त्यांनी सांगितले.
निर्बल इंडियन शोषीत हमारा आम दल म्हणजेच निशाद पक्षाने 2017 मध्ये 72 जागा लढवल्या होत्या आणि त्यांचा एकच उमेदवार निवडून आला होता. दोन वर्षानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर संजय निशाद यांचे पुत्र प्रविण निशाद कबिरनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. सप्टेंबर महिन्यात धर्मेंद्र प्रधान यांनी या दोन पक्षातील युती कायम राहणार असल्याचे संकेत दिले होते.