मुंबई – भाजप नेते गोपीनाथ मुंडे हयात असते तर महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती तुटली नसती, आज गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाल राऊत –
“गोपीनाथ मुंडे असते तर कदाचीत राज्याचे राजकारण आज जे दिसत आहे ते दिसले नसते. शिवसेना भाजपची युती राहावी टीकावी म्हणून ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. ज्यांच्याशी संवाद साधता येईल, ज्यांना राज्याचे राजकारन समजेल होते. ज्यांना शिवसेना काय आहे हे माहित होते असा आज गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही. त्यांच्याबरोबर 25 वर्ष जवळून काम केलं. लोकांमध्ये नाळ घट्ट जोडलेले ते नेते होते. महाष्ट्रात बहुजन समाजाची चळवळ आज दिसते त्याचे ते प्रणेते आहेत.”, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे असते तर युती कायम राहिली असती या वक्तव्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात याबाबत सकारात्मक विचार करता येईल, असे त्यांनी म्हंटले आहे. तर आज गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही या वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस आहे, मी त्यांना अभिवादन करतो. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजपा वाढवण्यासाठी खुप कष्ट घेतले. आजही अनेकजण प्रयत्न करत आहेत. कोणापेक्षा कोण कमी आहे याचं मुल्यमापन करणार नाही. राऊत यांनी आग लावण्याचे काम बंद करावे आणि पक्षाला लागलेल्या गळतीकडे लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही राऊत यांनी कौतुक केले आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार यशस्वी झाल्याचे सांगितले.