थिरूवनंतपुरम – देशातील पोटनिवडणुकांचे निकाल भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले असून खुद्द हिंदी भाषिक पट्ट्यातच भाजपचा प्रभाव ओसरत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस के,. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
राजस्थान आणि कर्नाटकात कॉंग्रेसने भाजपच्याही जागा खेचून घेतल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात सरळ लढती झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी कॉंग्रेसने भाजपला मात दिली आहे, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
ते आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. केंद्र सरकारने जी लोक विरोधी धोरणे सातत्याने राबवली आहेत त्याचाच हा परिपाक आहे. देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि इंधनाचे दर प्रचंड महागले आहेत.
त्यावरून खुद्द सरकारनेच सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे की काय असे वाटू लागले आहे असे ते म्हणाले. भाजपला आता प्रत्येक निवडणूक मतदारांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून जिंकता येणार नाही. लोक या सरकारला प्रचंड वैतागले आहेत, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.