कोल्हापूर (प्रतिनिधी) – प्रशासनाने, ई पास रद्द करावा आणि करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, जोतिबा देवस्थान दर्शनासाठी मंदिरातील प्रवेश खुला करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (ता.३ नोव्हेंबर) महाद्वार चौक येथे करवीर निवासिनी अंबाबाईचा जागर करण्यात आला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. भक्ती संगीत, गोंधळ या माध्यमातून अंबामातेचा जागर करून भक्तांना दर्शनासाठी मंदिराचे दार खुले करण्याची साद घातली.
‘देवी तूच या राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे आणि राज्यात सुरु असणारे चुकीच्या पद्धतीचे कार्य थांबू दे. आजच्या आंदोलनानंतर देखील प्रशासनाने ई पास व दरवाजे उघडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भाजपतर्फे यापुढे उग्र आंदोलन होईल, शिवाय भक्तांना दर्शनासाठी मंदिराचे दारे खुली करण्यात येतील असा इशारा दिला. देवीची आरती करून आंदोलनाची सांगता झाली.
‘गेले दिड वर्षे कोरोनाचे संकट चालू होते म्हणून भाविकांची श्रद्धास्थाने बंद होती. कोरोनाचे संकट कमी झाल्यांनतर भाजपाच्या सातत्याच्या मागणीमुळे राज्यातील सर्व मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात आली. परंतु कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिर प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे अद्याप ई पासची सक्ती करून, एक दरवाजा खुला करून सुरु आहे. यामुळे स्थानिक भाविकांमध्ये नाराजी आहे. मंदिरावर उपजीविका करणा-या अनेक घटकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.’
-राहुल चिकोडे, भाजप जिल्हाध्यक्ष
यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, राजू मोरे, विजय आगरवाल, चंद्रकांत घाटगे, अजित सूर्यवंशी, विजयसिंह खाडे-पाटील, सुनीलसिंह चव्हाण, इक्बाल हकीम, विशाल शिराळकर, नजीम अत्तार, अभिजित शिंदे, दिग्विजय कालेकर, गिरीष साळोखे, रवींद्र मुतगी सचिन सुतार, महेश यादव, किरण कुलकर्णी, बापू राणे, अशोक लोहार, ऋतुराज नडाळे, अमृत लोहार, प्रतिक मालंडकर, नजीर देसाई उपस्थित होते.