नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha Election 2024) विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व विरोधकांना अटक करण्याचे कारस्थान तो पक्ष रचत आहे. विरोधक नसलेल्या देशात मतं लाटण्याचा त्यामागील उद्देश आहे, असा सनसनाटी आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata banarjee) यांनी बुधवारी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना ईडीने समन्स बजावले आहे. इतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. विरोधकांचे फोन हॅक केले जात आहेत, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
बंगालसाठीचा मनरेगा निधी केंद्र सरकारने जारी करावा या मागणीवरून स्वीकारलेला आक्रमक पवित्रा ममता यांनी कायम ठेवला. निधीचा विषय केंद्राकडे मांडण्याचे आश्वासन राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांनी दिले होते.
त्यासाठी आम्ही दिलेली मुदत आज संपली. मात्र, काहीही घडले नाही. आता 16 नोव्हेंबरपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू. त्यानंतर कोणते पाऊल उचलायचे याविषयीचा निर्णय आम्ही घेऊ, असेही त्यांनी म्हटले.