मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यासह देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर आता आपण अधिवेशनात अनेकांची पोलखोल करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते त्याला भाजप कडून उत्तर देण्यात आले आहे.
आता भाजप खासदार अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून मालिकांवर खोचक टीका केली आहे. नवाब मलिकांचे गौप्यस्फोटांचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरुच आहे. यावर मलिकांना सल्ला देत भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, ‘हे पुड्या सोडायचे धंदे बंद करून जावयाला एखादा सभ्य धंदा टाकून द्या. अगदी भंगार आणि पंक्चरचाही चालले.’
भातखळकर यांनी या ट्विटच्या माध्यमातून नवाब मलिक यांना लक्ष्य केले आहे. नवाब मलिकांचा भंगाराचा धंदा आहे, या धंद्याचा संदर्भ देत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, भाजपचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी देखील मलिकांवर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, ‘जावईबापूंचा तसेच स्टारपुत्राचा बचाव करून हौस फिटली असेल तर मंत्री नबाब मलिक यांनी आता राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सरकारी कार्यालयातील फाईलींवर आता धूळ साचली आहे.’ असे म्हटले आहे.