नवी दिल्ली – “भाजपने आधी मणिपुरात आणि आता हरियाणात हिंसाचार माजवून भारत पेटवण्याचेच काम केले आहे. मणिपुरात तर भाजपने भारताच्या संकल्पनेची आणि भारत मातेची हत्या केली आहे. केंद्र सरकार देशद्रोही आहे,’ अशा घणाघाती शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवर हल्ला चढवला.
ते म्हणाले की, भारत हा एक आवाज आहे, तो हदयातून येणारा आवाज आहे आणि सरकारने मणिपुरात हा आवाजच दाबून टाकला आहे. मणिपुर हा भारताचा भाग आहे असे मोदी मानत नसावेत म्हणूनच ते अजून मणिपुरात गेलेले नाहीत. त्यांनी मणिपुरातील जनतेचे विभाजन केले. तुम्ही देशद्रोही आहात असे शब्दही त्यांनी उच्चारले. ते म्हणाले की मणिपुरात लष्कर पाठवले तर ते एका दिवसात तेथील हिंसाचार काबुत आणू शकतात, पण मोदी सरकारने तेथे लष्कर पाठवण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.
देशाच्या अन्य भागातही हिंसाचार माजवला जात आहे. त्यावरही राहुल यांनी सडकून टीका केली. मोदींच्या आणि सरकारच्या अहंकारी स्वभावाचाही त्यांनी उल्लेख केला व रामायणाचा दाखला देत ते म्हणाले की हनुमानाने लंका जाळलेली नाही, ती रावणाच्या अहंकारामुळे जळाली आहे. रामाने रावणाची हत्या केली नाही तर रावणाच्या अहंकारामुळेच त्याचा अंत झाला. हा अहंकारच तुम्हाला भोवणार आहे असे ते म्हणाले.
ेंयावेळी त्यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या त्यांच्या अनुभवाची माहिती दिली. ते म्हणाले की भाजप सरकारच्या धोरणांविरुद्ध जनतेशी संपर्क साधण्यासाठी मी प्रवास करत आहे. ही यात्रा म्हणजे त्यांच्यासाठी आत्म-शिक्षणाच्या दृष्टीने एक साक्षात्कार आहे. मी यात्रेला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात होते की मी दररोज 10 किमी धावू शकतो तर रोज 25 किमी चालणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण तो माझा अहंकार होता.पण भारत अहंकार एका सेकंदात पुसून टाकतो, दोन-तीन दिवसांत माझे गुडघे दुखायला लागले, ही जुनी जखम होती असे त्यांनी नमूद केले.
गेल्या वर्षी 130 दिवस मी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत फिरलो. लोकांसोबत फिरणे ही मला प्रिय असलेली गोष्ट आहे. आणि त्यांच्यासाठी मी मरायला किंवा तुरुंगात जाण्यास तयार आहे. सत्य हे आहे की हा देश एक आवाज आहे… भारत हा या देशाचा आवाज आहे हे ऐकण्यासाठी आपण द्वेष दूर केला पाहिजे असे, ते म्हणाले. आपली ही यात्रा अजूनही संपलेली नाही असे ते म्हणाले.
फ्लाईंग किसवरून सभापतींकडे तक्रार
भाषण संपवून बाहेर जात असताना राहुल गांधींनी सदस्यांना सद्भावनेचे प्रतिक म्हणून फ्लाईंग किस दिला. त्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. “संसदेच्या सभागृहात महिला बसलेल्या असताना त्यांनी अशी कृती करणे हे विक्षिप्तपणाचे व महिला सदस्यांमध्ये लज्जा उत्पन्न करणारे होते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यात सभ्यता आणि संस्कृतीचा अभाव आहे, अशी प्रतिक्रीयाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना नोंदवली. नंतर हा विषय अधिक गंभीर करताना भाजपच्या 20 महिला खासदारांनी सभापती ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली.
मी तुम्हाला फार त्रास देणार नाही
राहुल गांधी यांच्या भाषणाविषयी मोठीच उत्सुकता होती. ते भाजपवर तुफानी हल्लाबोल करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी, “मै तुम्हे जादा कष्ट देना नही चाहता. मी आज अदानींवरही बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही आज निश्चींत राहा,’ असे म्हणत त्यांनी भाजप सदस्यांना आश्वस्त केले. तसेच आज एक दोन तोफगोळे मी डागणार आहेच पण त्यामुळे तुम्ही फार विचलीत होऊ नका. मागचे माझे भाषण जरा जास्तच कडक होते. त्यामुळे तुम्हाला जरा त्रासच झाला पण यावेळी तसा त्रास मी तुम्हाला देऊ इच्छित नाही असेही राहुल यांनी म्हटले.