मुंबई – राज्यसभेतील वृद्ध, ज्येष्ठ खासदारांची संख्या हळूहळू कमी करून भाजप तिथे फारसा अनुभव नसलेल्या, नव्या दमाच्या तरुणांना पाठवण्याच्या तयारीत आहे. यात ४० ते ५० वर्षे वयोगटातील नेत्यांची संख्या अधिक राहणार आहे.
संसदेचे वरिष्ठ सभागृह तरुण नेत्यांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. जनतेच्या भावना, प्रश्न समजून घेण्यासाठी तरुण नेत्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या नेत्यांनी लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या माध्यमातून नियम, कायदे, मुद्दे व जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, कामकाजाबाबत गंभीर राहावे, अशी भाजपची इच्छा आहे.
राज्यसभेत भाजपचे ९३ खासदार आहेत. यात ६१ पेक्षा अधिक वयाचे ४२, ५१ ते ६० वर्षांचे ३७ व ४० ते ५० वर्षांचे ९ आहेत. यावर्षी एप्रिल ते जुलैदरम्यान राज्यसभेत भाजपच्या कोट्यातून २९ खासदार निवृत्त होत आहेत. या जागांवर पक्ष तरुणांना संधी देणार आहे. या नेत्यांनी लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या माध्यमातून नियम, कायदे, मुद्दे व जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, कामकाजाबाबत गंभीर राहावे, अशी भाजपची इच्छा आहे.
दिग्गज मंत्र्यांना लोकसभा उमेदवारी देण्याची तयारी
भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया हे मंत्री राज्यसभेवर होते. पक्षाचे म्हणणे आहे की, ते राज्यसभेत असताना मुद्द्यांबाबतचे त्यांचे आकलन खूप चांगले झाले आहे. यापैकी अनेकांना आता लोकसभेच्या मैदानात उतरवले जाणार आहे.