दिब्रुगड (आसाम) – भाजपाचे विरोधक पंतप्रधान मोदींबद्दल जितके वाईट बोलतील, तितकी भाजप पुढे जाईल. सत्ता अनेक वर्षे हातात नसल्याने कॉंग्रेस बिथरली आहे. तरीही आगामी सार्वत्रिक निवडणुकीत, भाजपा 300 हून अधिक जागा जिंकून सत्तेत येईल आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे भाकित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वर्तवले आहे. आसाममधील दिब्रुगड येथे एका सभेला संबोधित करताना शहा बोलत होते.
शहा पुढे म्हणाले की, ईशान्येतील राज्ये हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र, राहुल गांधींच्या दौऱ्यानंतरही कॉंग्रेसला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा आसामच्या 70 टक्के भागातून काढून टाकण्यात आला आहे.
इतर राज्यांशी असलेले सीमावाद सोडवले जात आहेत. राहुल गांधी यांनी परदेशात भारताचा अपमान केला, ते असेच चालू राहिले तर कॉंग्रेस केवळ ईशान्येतूनच नाही तर संपूर्ण देशातून नष्ट होईल. भाजप आसाममध्ये लोकसभेच्या 14 पैकी 12 जागा जिंकेल.
नुकत्याच मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. भाजपने त्रिपुरामध्ये सरकार स्थापन केले आणि इतर दोन राज्यांमध्ये मित्रपक्षांसह सत्तेत परतले. राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांचा संदर्भ देताना शहा म्हणाले, त्यांनी (राहुल) परदेशी भूमीतून भारताचा अपमान केला, जर त्यांनी असेच सुरू ठेवले तर त्यामुळे त्यांचेच नुकसान होईल, शिवाय कॉंग्रेसचाही नाश होईल. अमित शहा म्हणाले की, बोडोलॅंड आणि कार्बी आंगलॉंग भागात शांतता आहे आणि राज्याचा शेजारील राज्यांशी असलेला सीमा विवाद सोडवण्यात आला आहे.