सोलापूर – खाजगी नोकर भरती करण्यासाठी भाजपने आरक्षण रद्द करण्याचा मोठा डाव आखला आहे. त्यासाठीच भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला आहे. भाजपने ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती सुरू केली आहे. यामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा निशाना कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर साधला आहे. तसेच, सोलापूरचा खासदार कॉंग्रेसचाच (Congress) असणार, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचेही त्यांनी म्हणत आगामी लोकसभा (Solapur Loksabha) निवडणूक लढविण्याचेही संकेत मंगळवारी दिले.
शिंदे पुढे म्हणाल्या की, राज्यातील खोके सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काही पडले नसून जनता निराश झाली आहे. त्यामुळेच या सरकारला जनतेतून पाठिंबा नसल्याने हे सरकार निवडणुकांना सामोरं जायला घाबरत असल्याने महापालिका निवडणूक आता बहुदा लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर होतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर महाराष्ट्रात रेशन दुकानात धान्य मिळत नाही, सिलेंडरचा भाव वाढला आहे, शेतकरी, कामगार आणि एकंदरीत जनता या सरकारमुळे निराश आणि हताश झाली आहे. अशावेळी महाराष्ट्राला स्थिर आणि चांगले सरकार महाराष्ट्र लोकशाही आघाडीच देऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कॉंग्रेस आवाज उठवणार
सध्याचे राज्य सरकार हे सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिंदू नामावली आणि आरक्षण रद्द करण्याचे कट कारस्थान सुरु असून हे सरकार त्यांच्या मर्जीतील सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकत आहे. एका बाजूला नोकऱ्या देण्याचे आश्वासन देताना दुसऱ्या बाजूला कायम नोकऱ्यांचे खासगीकरण करून हे सरकार त्यांच्या ठराविक लोकांसाठीच महाराष्ट्र विकण्याचे काम करत आहे. त्याच्या विरोधात कॉंग्रेस आवाज उठवणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.