रांची : झारखंडमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीतील एक्झीट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इंडिया टुडे – ऍक्सिस-माय इंडियाच्या अनुमानानुसार कॉंग्रेस, राजद आणि झारखंडमुक्ती मोर्चा 81 पैकी 38 ते 50 जागा पटकावेल. सीव्होटर -एबीपीच्या मतदानोत्तर कलचाचनीतील अनुमानानुसार भाजपा 28 ते 36 जागांवर विजय मिळवेल. त्यामुळे िुवधानसभेतील बहुमताचा जादुई 41जागांचा आकडा गाठण्यासाठी ऑल झारखंड स्टुडंट युनियन आणि माजी मंत्री बाबूलाल मिरांडी यांच्या भुमिकेला महत्व येण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे ऑक्सिसच्या अंदाजानुसार कॉंग्रेस आघाडीला 37 टक्के मते मिळतील तर भाजपाला 34 टक्के मते मिळतील. झारखंड विकास मोर्चा आणि ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन अनुक्रमे दोन ते चार आणि तीन ते पाच जागा मिळवू शकतील. चार ते सात जागा अपक्षांना मिळतील.
भारतीय जनता पक्षासाठी सुधारित नागरीकत्व कायद्याच्या अंमलबजावणीनंतर ही लिटमस टेस्ट ठरणार आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळवू न शकल्याने ही निवडणूक भाजपसाठी महत्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री रघुबर दास हे प्रस्थापितांविरोधातील लाट, रोजगार निर्मितीतील अपयश आणि उमेदवार निवडीवरून पक्षांतर्गत झालेले वाद अशा अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. या विधानसभेत केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात रघुबर दास असे विकासाचे डबल इंजिन कामाला लागेल, असा प्रचार भाजपाने केला होता. कॉंग्रेसने आपल्या प्रचाराचा मुख्य रोख झारखंड राज्यावर केंद्रीत ठेवला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 37 जागा मिळाल्या होत्या. ऑल झारखंड स्टुडंस् युनियनने पाच आणि बाबूलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाने सहा आमदरांसह भाजपला पाठींबा दिला होता.
2014 मध्ये कॉंग्रेसने 62 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी सहा जागांवर विजय मिळाला होता तर 42 जागांवर त्यांना अनामत रक्कम गमवावी लागली होती.