कोलकाता – बंगालच्या विकासात भाजपकडून कोणतीच भरीव कामगीरी झाली नाहीं, त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही त्यामुळे भाजप नेत्यांनी आता बंगाल मध्ये येऊन केवळ बदनामीची मोहीम हाती घेतली आहे असा आरोप तृणमुल कॉंग्रेसने केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, सार्वजनिक जीवनात एखाद्याची व्यक्तीगत बदनामी करण्याचा प्रयत्न टाळला गेला पाहिजे, भाजपच्या नेत्यांनी हे भान राखावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पश्चिम बंगालच्या विकासाच्या संबंधात खुली चर्चा करायची असेल तर आमची त्याला तयारी आहे. त्यासाठी भाजपनेही तयारी दाखवली पाहिजे. पण भाजपकडे त्या संबंधात बोलण्यासारखे काहीही नसल्याने त्यांचे नेते बंगाल मध्ये येऊन लोकांना भडकावणे, नेत्यांचे चारीत्र्य हनन करण, सलोखा बिघडवणे असे कृत्य करीत असतात.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी तृणमुल कॉंग्रेसच्या एका युवा खासदाराची व्यक्तीगत बदनामी करणारी वक्तव्ये काल केली होती, त्याचाही दाखला घोष यांनी दिला. ज्या तरूण नेत्यांपासून भाजपला भीती वाटत असते त्याच नेत्यांच्या बदनामीचा सतत प्रयत्न भाजपकडून सुरू असतो असे ते म्हणाले. भाजपकडून राजीव गांधींच्या काळापासून हा प्रकार सुरू आहे असे ते म्हणाले.