मुंबई : राज्यातील सध्या चाललेल्या सत्तानाट्यावरून शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया एका टीव्ही माध्यमाशी बोलताना दिली आहे. कोविडकाळात दिलासा देणाऱ्या संयमी, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना गमावल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला दुःख आहे असे त्यांनी म्हंटले आहे.
चांगले चाललेले घर तुम्ही मोडून काढले
प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या , सध्याच्या परिस्थितीत ” चांगले चाललेले घर तुम्ही मोडून काढले. ईडी लागली म्हणून भाजपा हवी. भाजपा सोबत असताना तुमच्या याच कुरबुरी होत्या, असा आरोप त्यांनी बंडखोरांवर करत आता गेल्या घरी सुखी रहा, असे किशोरी पेडणेकर यांनी सुनावले आहे. कोविड काळात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने कारभार हाताळला, जनता त्यांना कायम लक्षात ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.
उद्धवजींसोबत जनता
पुढे बोलताना त्या म्हणाल्या , “तीव्र चीड आणि वाईट वाटते आहे, ते म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत. मात्र केवळ सत्तेसाठी तुम्ही हे केले. उद्धवजींसोबत जनता आहे. बाळासाहेबांचा विचार हा पुढे जात राहील, त्यासाठी असे बंड गरजेचे होते का, असा सवाल त्यांनी केला आहे. कारणे देऊ नका. जे झाले त्याला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. मुंबई महापालिका अडचणीची असली, तरी अडचणींवर मात करून पुढे निघायचे असते, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
कोविडकाळात दिलासा देणाऱ्या संयमी, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना गमावल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला दुःख आहे, राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या विचारांना फाटा दिला. अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
.