सुरत – भाजपचे सूरत मतदार संघातील उमेदवार मुकेश दलाल हे तेथून बिनविरोध निवडून आले आहेत. या मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला असून त्यांचे डमी म्हणून अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवाराचाही अर्ज बाद करण्यात आला आहे.
त्यानंतर तेथे बाकीचे जे आठ उमेदवार होते त्या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवाराला बिनविरोध निवडून आले आहेत.
प्रदेश भाजप अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी यावर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, सुरतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिले कमळ अर्पण केले आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील आमचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
VIDEO | Surat District Collector gives Member of Parliament (MP) certificate to BJP’s Mukesh Dalal, who was elected unopposed from Surat Lok Sabha seat after all other candidates withdrew from the fray. #LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024 pic.twitter.com/0raJgl8RGu
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2024
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्यारेलाल भारती अशा तब्बल ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.कॉंग्रेसने येथे नीलेश कुंभानी यांना उमेदवारी दिली होती व त्यांचे डमी म्हणून सुरेश पडसाला यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु त्या दोघांचे अर्ज तांत्रिक कारणांनी बाद ठरवले गेले आहेत.
दहशत माजवून कॉंग्रेसचा अर्ज बाद केला – उमेदवाराच्या वकिलाचा दावा
सूरत मतदार संघात कॉंग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज भलत्याच कारणावरून बाद करण्यात आला. या उमेदवाराला ज्यांनी सूचक म्हणून सह्या दिल्या होत्या त्यांच्या सह्या जुळत नाहीत आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना तीनपैकी एकही सूचक उपस्थित ठेवला गेला नाही, असा आक्षेप घेतला गेला आणि तो ग्राह्य मानून त्यांचा अर्ज बाद केला गेला.
त्यांचा अर्ज बाद झाला तर कॉंग्रेसने तेथे सुरेश पडसला हा पर्यायी उमेदवारही दिला होता. त्यांचाही अर्ज याच कारणाने बाद झाला आहे. या संबंधात बोलताना कॉंग्रेस उमेदवाराचे वकिल बाबू मांगुकिया यांनी म्हटले आहे आमच्या उमेदवाराच्या अर्जावर ज्यांची सूचक म्हणून स्वाक्षरी होती, त्या तिघांचेहीअपहरण करण्यात आले आहे. सरकारच्या दहशतीखाली सगळेच घाबरलेले आहेत. त्यांच्या सह्या जुळवून पाहिल्याशिवाय कॉंग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करणे चुकीचे आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचक म्हणून सह्या करणाऱ्यांच्या अपहरणाची चौकशी करायला हवी होती असेही त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने सूरत मध्ये केलेली ही मॅच फिक्सींग आहे. मोदींच्या अन्याय काळात सूरत मधील लघु उद्योजक आणि व्यापारी चांगलेच त्रासले असून त्यांच्या नाराजीचा सूरत मध्ये फटका बसू शकतो याची चिंता वाटल्यानेच भाजपने ही मॅच फिक्सींग केली आहे असे ते म्हणाले.