सरकारने संसदेतच दिली लेखी माहिती – कॉंग्रेसची टीका
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने 2014 नंतर विकासाच्या नावाखाली देशातील आत्तापर्यंत एक कोटी झाडे पाडण्यास अनुमती दिली आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. झाडे हे पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहेत. ऑक्सिजन निर्मीतीच्या प्रक्रियेत वृक्षांचे योगदान महत्वाचे आहे. पण त्याचे काहीही महत्व मोदी सरकारच्या लेखी नाही. सरकारने गेल्या पाच वर्षात 1 कोटी 9 लाख 75 हजार 844 वृक्षांच्या तोडणीला अनुमती दिली आहे.
खुद्द सरकारनेच संसदेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे असे कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या या उत्तराचा भागही ट्विटवरवर पोस्ट केला आहे. भाजप आपले भवितव्य उद्धवस्त करीत आहे काय? असा सवालही त्यांनी विचारला आहे. पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी वृक्षतोडीची ही माहिती नुकतीच संसदेत दिली आहे.