– दिलीप राणे ,वरिष्ठ पत्रकार
राजकारणाबरोबरच उद्योग, कृषी, फळबागा, साहित्य, कला, संस्कृती, नाटक, आधुनिक तंत्रज्ञान, क्रीडा, प्रवास, वाचन असा सर्व विषयांमध्ये ज्यांना रुची आहे आणि ज्यांच्या वागण्याबोलण्यातून या सगळ्या व्यासंगाचा प्रत्यय येतो असे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार. सर्वपक्षीय राजकीय नेते आणि नागरिक वेगवेगळ्या क्षेत्रातील मदतीसाठी येत असतात. गेल्या 50 वर्षातील संसदीय कारकिर्दीत हे सगळे करत असताना त्यांना सातत्याने टीकेचे घाव सहन करावे लागले तरीही हे व्यक्तिमत्त्व न डगमगता कायम आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.
केवळ टीकाच नव्हे तर अऩेकदा खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप झाले. या आरोपांकडे पवारसाहेबांनी कधीही लक्ष दिले नाही. त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. ते कायम सामाजिक एकोपा आणि समाजातील मागास, उपेक्षित घटकांना न्याय देण्याच्या बाजूने राहिले. मराठवाडा विद्यापीठाच्या नावाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय 14 जानेवारी 1994 रोजी घेतला. त्यांनी फार मोठ्या निश्चयाने हा निर्णय घेतला.
त्याचे बरेवाईट परिणाम होणार याची त्यांना जाणीव होती. हा विषय एका बैठकीत आला तेव्हा भल्या भल्या नेत्यांनी त्यांना सांगितले की, असा निर्णय घेऊ नका. त्यांनी सगळ्यांचे ऐकून घेतले आणि तिथे भाषण करताना म्हणाले, आपण एका विचाराने हा निर्णय घेतले आहे. सत्ता जाईल, असे सांगितले जात आहे. परंतु आपली जी राजकीय भूमिका आहे ती पुरोगामी विचारांची आहे. त्या भूमिकेपासून दूर जाऊन सत्ता मिळवायाची अशी धारणा असेल तर मला असे स्पष्टपणे सांगायचे आहे की, सत्ता मिळाली नाही तरी काही हरकत नाही.
जी भूमिका वाट्याला येईल ती पार पाडू. पण घेतलेला निर्णय बदलणार नाही. त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ओबीसींसाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणे. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाचा निर्णय विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या सरकारने मान्य केला. देशात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य होते की, ज्याठिकाणी मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर दंगल झाली नाही. या शिफारशी स्वीकारून शरद पवार यांनी अनेक उपेक्षित जातींना मोठी संधी उपलब्ध करून दिली.त्यांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासाकडेही कायम बारकाईने लक्ष दिले.
त्यामुळे बारामती आज ग्रामीण विकासाचे एक प्रारूप मॉडेल बनले आहे. त्याविषयी शरद पवार नेहमी सांगत असतात की, बारामती पॅटर्न म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत उभे राहणे, फक्त आठ इंच सरासरी पाऊस पडणाऱ्या, सत्तर टक्के दुष्काळी भाग असणाऱ्या या पन्नास किलोमीटर परिसरात आज बारा साखर कारखाने आहेत. इथली द्राक्षे परदेशातील बाजारपेठांमध्ये जातात. इथे तयार होणारा फळांचा रस देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. पिझ्झाहट, मॅकडोनाल्डसारख्यांना लागणारे चीज बारामतीतून जाते.
या पॅटर्नमध्ये मनुष्यबळ समृद्ध झाले. खेड्यातील मुले उच्चशिक्षित बनून बाहेरच्या जगात ठसा उमटवू लागली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाचा विचार केंद्रस्थानी आला. बारामती पॅटर्नचे हेच वैशिष्ट्य आहे. आजही सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरु होतो. गेली सुमारे साठ वर्षे हे अव्याहतपणे चालू आहे. बहुतेकांना स्वतःवरील टीका अजिबात सहन होत नाही. परंतु कितीही कठोर टीका झाली तरी ती ऐकून घ्यायची आणि त्या व्यक्तीशी मित्रत्वाचे संबंध ठेवायचे हे त्यांच्या वागण्याचे सूत्र आहे. ते स्वतः मोठे नेते असले तरी राज्यशिष्टाचार किंवा प्रोटोकॉल त्यांच्याकडून कधीही मोडला जात नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती हा असाच त्यांचा एक गुण.
त्याच गुणाच्या जोरावर त्यांनी दुर्धर व्याधीवर मात केली. जबरदस्त इच्छाशक्ती असली की, कुठलीही गोष्ट शक्य होते हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळेच दुर्धर आजाराशी सामना करत असतानाही उपचार घेतले की, लगेच सार्वजनिक कार्यक्रम, बैठका, प्रवास असा त्यांचा दिनक्रम असायचा. आजारवर मात करताना ते निर्धारपूर्वक कामात व्यस्त राहिले. वाढत्या वयातही त्यांची इच्छाशक्ती कधीही कमी झाली नाही. आजही त्यांचा कामाचा झपाटा कायम आहे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो यासाठी शुभेच्छा!