नवी दिल्ली – बिहारमधील महत्त्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावाला 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, आठवडाभरापासून तेलंगणात तळ ठोकून बसलेले काँग्रेसचे आमदार रविवारी संध्याकाळपर्यंत पाटण्यात परतणार आहेत. त्यानंतर हे आमदार मतदान होईपर्यंत राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी राहणार आहेत.
काँग्रेसचे आमदार आणि डाव्या पक्षांचे आमदार सोमवारपर्यंत तेजस्वी यादव यांच्या सरकारी बंगल्यात राहतील.२४३ सदस्यांच्या विधानसभेत सत्तारूढ एनडीए आघाडीकडे १२८चे संख्याबळ आहे. दरम्यान, शनिवारी यादव यांच्या घरी स्नेहभोजनासाठी पोहोचलेल्या राजद आमदारांनाही विश्वासदर्शक ठरावापर्यंत येथेच थांबण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपकडून महागठबंधन आमदारांची शिकार केली जाऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सत्तारूढ एनडीएकडे बहुमत असले तरी ते अगदी काठावर आहे. त्यामुळे त्यांना आपली सत्तेवरील पकड मजबूत करण्यासाठी आणखीही काही मतांची गरज भासणार आहे.
नितीश कुमारांची लिटमस टेस्ट
नितीश कुमार यांनी पुन्हा राजकीय कोलांटउडी मारत राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीची साथ सोडत पुन्हा भाजपशी मैत्री करून बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन केले. आता ते नवे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे.
जेडीयूने विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी रविवारी सायंकाळी पाच वाजता आमदारांची बैठक घेतली. ही बैठक मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या उपस्थितीत नीट पार पडली. असं असलं तरी उद्या खऱ्या कसोटीचा सामना नितीश कुमारांना करावा लागणार आहे.