पाटणा: पंधराव्या वित्त आयोगाने बिहारला जो निधी देण्याची शिफारस केली आहे तो निधी केंद्राने त्वरित अदा करावा, अशी मागणी करणारे पत्र बिहार सरकारचे अर्थमंत्री व तेथील भाजप नेते सुशिलकुमार मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पंधव्या वित्त आयोगाने बिहार सरकारला पंचायत राज संस्थांसाठी 5 हजार 18 कोटी रूपये, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2 हजार 416 कोटी रूपयांचे अनुदान देण्याची शिफारस केली आहे.
हा निधी केंद्राने अजून दिलेला नाही. तो निधी त्वरित खुला करावा, अशी मागणी सुशिलकुमार मोदींनी केली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्याच तिमाहीत ही रक्कम राज्याला मिळाली तर राज्यातील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी तसेच अन्य आवश्यक उपायांसाठी हा निधी उपयोगी पडू शकतो. विद्यापीठ शिक्षकांचे पगार आणि समग्र शिक्षा अभियानासाठीचाही निधी केंद्र सरकारने त्वरीत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.