मुंबई – भाजपसाठी आजचा दिवस “कभी खुशी कभी गम”, असाच काहीसा ठरला. विधान परिषद निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले असून नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले. मात्र निलंबीत 12 आमदारासंदर्भातील निर्णय भाजपच्या विरोधात गेला आहे.
विधानसभा सभागृहात जुलैमध्ये गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबीत करण्यात आलं होतं. या निलंबनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात या आमदारांना हजर राहता येणार नाही, असही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होईल.
भाजपच्या निलंबीत झालेल्या 12 आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांडडिया यांचा समावेश आहे.
दरम्यान निलंबनानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना न्यायालयाकडून देखील दिलासा मिळाला नाही. न्यायलायने निलंबनाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच पुढील हिवाळी अधिवेशनाला देखील त्यांना हजर राहता येणार नसल्याच स्पष्ट केलं.
भाजप आमदारांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून सभागृह गदारोळ घातला होता. तसेच अध्यक्षांना शिवीगाळ केली होती. या वर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षानं निलंबनाचा ठराव आणला होता. निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर मुंबई व नागपूर विधिमंडळलाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.