परभणी – सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या बदल्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने 272 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर केला असून आतापर्यंत 2 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 250 कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अतिवृष्टी व सततच्या पावसाने 2021 च्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे 3 लाख 78 हजार 307 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारीनंतर विमा कंपनीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना विमा कंपनीने 272 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली.
दरम्यान, तालुका स्तरावर एकच विमा प्रतिनिधी असल्याने तसेच ऑनलाइन तक्रारीत बऱ्याचदा अडथळे आल्याने अनेक शेतकऱ्यांकडून नुसकसानीची विमा कंपनीकडे तक्रार नोंदवली गेली नाही. त्या शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित महसूल मंडळनिहाय नुकसान भरपाई लागू झाल्यास पीक विमा वाटप करण्यात येणार अससल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. माहितीनुसार, मार्च महिन्यात तक्रार न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही रक्कम जमा करण्यात येणार आहे.