धुळे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या आदेशाला बाजुला ठेवत वेगळी भूमिका घेतल्यानंतर मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.
आता धुळ्याचे उपमहानगर प्रमुख साहिल खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. इतकेच नाही, तर त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कडव्या हिंदुत्वावर स्वार होण्याचा राज ठाकरे यांना फायदा किती होईल, हे लगेच सांगणे अवघड आहे.
मात्र, त्यांना सध्या याची जबर किंमत मोजावी लागतेय. हे नक्की. मुंबईसह अठरा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असा एकेक शिलेदार गळणे राज ठाकरे यांना चांगले महागात पडू शकते, अशी चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.