नवी दिल्ली : राष्ट्रवादाचा आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणेचा गैरवापर केला जात आहे. भारताच्या लाखो रहिवासी आणि नागरिकांना वगळण्यासाठी अतिरेकी आणि निव्वळ भावनिक कल्पना तयार करण्यासाठी या घोषणेचा गैरवापर केला जात आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू यांचे कार्य आणि भाषणावरील पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
जर चिरंतन लोकशाही म्हणून भारताची ओळख कायम असेल आणि जर भारतास एक महत्त्वाचे जागतिक सामर्थ्यसंपन्न राष्ट्र मानले जात असेल, तर ही ओळख पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनीच निर्माण केली आहे. नेहरूंनी अस्थिर आणि सुरुवातीच्या काळात या देशाचे नेतृत्व केले होते. त्याच काळात त्यांनी लोकशाही स्वीकारली आणि भिन्न सामाजिक, राजकीय दृष्टीकोनांचाही अंगिकार केला होता, असेही सिंग म्हणाले.
पंडीत नेहरू यांना भारतीय वारशाबद्दल अभिमान होता, त्याशिवाय नव्या आधुनिक भारताच्या गरजेनुसार त्यांनी सामंजस्याने बदलही घडवले. अतुलनीय शैली आणि बहु-भाषातज्ञ असलेल्या नेहरूंनी आधुनिक भारतातील विद्यापीठे, अकादमी आणि सांस्कृतिक संस्थांची पायाभरणी केली. नेहरूंच्या नेतृत्त्वाने स्वतंत्र झालेला भारत देश त्यांच्या नेतृत्वाशिवाय आज स्वतंत्र नसता, असेही सिंग म्हणाले.
इतिहासाचे अवलोकन करण्याइतका संयम नसलेल्यालोकांकडून त्यांच्या पूर्वग्रहदूषित विचारांमुळे नेहरूंची योग्यता ओळखता येत नाही. मात्र अशा चुकीच्या धारणा इतिहासात चुकीच्या सिद्ध होतील, असा विश्वासही मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.
पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधा कृष्णा यांच्या ‘हू इज भारत माता’ या पुस्तकात नेहरूंचे आत्मचरित्र, ग्लिंप्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ऍन्ड डिस्कव्हरी ऑफ इंडियामधील उताऱ्यांचे संकलन आहे. याशिवाय नेहरूंच्या भाषणातील अंश, काही निवडक पत्रव्यवहार आणि अन्य लेखनही आहे.