हरियाणा – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणापर्यंत पोहोचली आहे. त्यांनी येथील सभेत बोलताना आरएसएस वर टिकास्त्र सोडले. आरएसएस संगठन 21 व्या शतकातील कौरव असल्याची उपमा देत चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधी संपूर्ण यात्रेत भाजपच्या चुकीच्या धोरणांची माहिती जनतेसमोर मांडत आहे. यावेळी त्यांनी जाहीर सभेत भाजपसह थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रहार केला. राहुल यांच्या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
हरियाणा मधील तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, हरियाणा हे राज्य कौरव आणि पांडव याच्यात महाभारत युद्ध झालेली भूमी आहे. कौरव कोण होते ? असा मिश्किल प्रश्न उपस्तिथ करत राहुल म्हणाले, 21 व्या शतकातील कौरव खाकी हाफ पॅन्ट घालतात, हातात काठी घेऊन ठिकठिकाणी शाखा उघडून बसतात. त्यांच्यासोबत भारतातील दोन, तीन अब्जपती आहेत.
त्यानंतर काॅंग्रेस कार्यकर्त्यांची पांडवांसोबत तुलना करत राहुल गांधी म्हणाले, पांडवांनी कधी गरीबांवर अन्याय केला का? नोटबंदी केली का? चुकीची जीएसटी लागू केली होती का? त्यांनी असे कधीच केले नाही. कारण ते जाणत होते की, नोटबंदी, चुकीची जीएसटी, कृषी कायदे हे लोकांच्या नुकसानीचे आहेत. आजची लढाई देखील महाभारतातील लढाईसारखीच आहे. एका बाजूला पाच तपस्वी आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक मोठे संगठन. पांडवांसोबत सर्वधर्मीय लोक होते. ही भारत जोडो यात्रा प्रेमाचे दुकान आहे. महाभारतातील पांडवही अन्यायाविरुद्ध उभे राहिले, त्यांनीही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले.