लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद येथील ग्रामदैवत श्री. कालभैरवनाथ देवाची यात्रा मंगळवार (दि. ७) पासून सुरू झाली आहे. यात्रेनिमित्त ( दि. ११) पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लोणंदच्या श्री.कालभैरवनाथ यात्रा समितीने दिली.
लोणंद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खेमावती नदीतीरी अष्टभैरवां पैकी संन्यासी रुपातील श्री. कालभैरवनाथांचे दगडी बांधकामातील भव्य व आकर्षक शिवकालीन मंदिर आहे. यावर्षीही यात्रे निमित्त मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ७ ) रोजी यात्रेचा पहिला दिवस होता.
सकाळी साडेसात वाजता देवांच्या पादुकांना पालखीतून नीरा नदी येथील दत्तघाट याठिकाणी स्नानासाठी नेण्यात आले. त्यानंतर मंदिरात महाअभिषेक, देवाचा मानाचा पोशाख झाल्यावर मंदिर भाविकांच्या दर्शणासाठी खुले ठेवण्यात आले. दिवसभर येथे देवाला पुरणपोळीचा नेवैद्य व नारळ अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तर रात्री ढोल-लेझिमच्या गजरात देवाची पालखीतून भव्य मिरवणूक (छबीना) काढण्यात आला.
हनुमान मंदिर पटांगणावर ढोल-लेझीम स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या पथकांस अनुक्रमे १५,११ व ७ हजार रुपये रोख बक्षिसे व ट्राॅफी तसेच सहभागी प्रत्येक ढोल -लेझीम पथकांस दोन हजार रूपये उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार आहे.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी ( दि. ८) रोजी सकाळी दहा वाजता बाजारतळ येथे रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. सांयकाळी ५ ते ७.३० या वेळेत गोटेमाळ येथे नामवंत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार आहे. तर रात्री ७ ते ९.५५ वाजता बाजारतळावर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी (ता. ९) रोजी सकाळी सात ते १ या वेळेत तुळजापूरहून येणाऱ्या मानाच्या सासण काठ्यांचे स्वागत व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर रात्री ७ ते ९.५५ वाजेपर्यंत बाजारतळाच्या पटांगणावर गौतमी पाटील यांचा लावणी कार्यक्रम होणार आहे. तर शनिवार (ता. ११) रोजी गोटेमाळ निंबोडी रस्ता येथे भव्य बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन केले आहे. विजेत्या पहिल्या पाच क्रमांकांच्या बैलगाड्यांना अनुक्रमे ६१,५१, ४१,३१ व २१ हजार रुपये रोख व ढाल बक्षीस देण्यात येणार आहे. ग्रामस्थ व भाविकांनी यात्रेच्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेवून यात्रा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही यात्रा समितीने केले आहे.