नवी दिल्ली – “केंद्र सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासोबतच त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल याकडे लक्ष द्या. विरोधी पक्षांचे नेते आपल्याला भडकविण्याचा प्रयत्न करतील. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करा आणि गरिबांची सेवा करण्याचे काम सुरू ठेवा,’ असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एनडीए’च्या दक्षिणेतील मित्रपक्षांना बैठकीत दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीत रालोआला बहुमत मिळवून देण्यासाठी व्यूहरचना आखायला सुरवात केली आहे. याच श्रृंखलेत मोदी यांनी गुरुवारी संसदेच्या अनेक्सीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील दक्षिणेतील पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. यात तब्बल 48 खासदारांनी भाग घेतला होता. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेतील सत्तापक्ष नेते पियुष गोयल, नभोवाणी मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आणि अर्जुन राम मेघवाल आदी मंत्री उपस्थित होते.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये भाजप आणि रालोआच्या घटक पक्षांचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून आणता येईल यावर पंतप्रधानांचा भर आहे. दक्षिणेतील एकाही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही. कर्नाटकमधील भाजपची सत्ता सुध्दा कॉंग्रेसने आपल्या ताब्यात घेतली आहे.
आंध्रप्रदेश (25), तेलंगणा (17), तामिळनाडू (39), केरळ (20) आणि कर्नाटक (28) या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या 129 जागा आहेत. आगामी निवडणुकीत यातील किमान 60 जागांवर भाजप आणि रालोआचे खासदार निवडून यायला पाहिजे, अशी रणनिती भाजपने आखाली आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुुरूवारी दक्षिणेतील 48 खासदारांसोबत निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा केली.