- सागर पानमंद : फसवणुकीचा धोका वाढला
चिंचवड – भारतीय नागरिकांचा इतरांवर विश्वास ठेवणे हा नैसर्गिक स्वभावधर्म आहे. हा गुणधर्म ओळखून सायबर हल्लेखोर सोशल मीडियावर फेक प्रोफाइल तयार करतात, आपल्याशी मैत्री वाढवितात नंतर परस्परात विश्वास संपादन करतात व फसवणूक करतात. त्यामुळे नागरिकांनी, पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मैत्री करताना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे मत पुणे सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद चिंचवड येथे ऑनलाइन वेबिनारद्वारे व्यक्त केले.
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालय व क्वीक हिल यांच्यातर्फे “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक व प्राध्यापक यांच्यासाठी ऑनलाइन वेबीनारद्वारे करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. दीपक शहा, डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. राजेंद्र कांकरिया, क्वीक हिलच्या सुगंधा दाणी, डॉ. जयश्री मुळे, प्रा. हर्षिता वच्छानी तसेच 700 हून अधिक पालक, विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.
या वेळी मार्गदर्शन करताना पानमंद म्हणाले, वैयक्तिकरित्या सरकारी, खासगी क्षेत्रात अतिसंवेदनशील विभागातील अधिकारी, कर्मचारी इतर प्रमुखाबरोबरही विश्वास संपादन करून गोपनीय माहिती हल्लेखोर सोशल मीडियाद्वारे काढून त्याचा दुरुपयोग इतरत्र करण्याची शक्यता असते. तसेच पैसे उकळणे, खंडणी धमक्या देणे आदी प्रकारही केले जातात. सोशल मिडीया आजच्या काळात रोजगार, व्यवसाय आदी क्षेत्रात नवसंजीवनी असती तरी, स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने पुरेपुर तांत्रिक माहिती आत्मसात करणे, मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटद्वारे व्यवहार, मैत्री करताना स्वतःवर बंधने घालणे अत्यावश्यकच आहे.
गोपनीय सिक्युरिटी पासवर्डचा वापर करताना अनेकजण आपल्या मोबाइलचा नंबर, मुलांचे नाव, गाडी क्रमांक आदींच्याच वापर करताना आढळून आले आहे. त्यामुळे सायबर हल्लेखोरांकडून आपले खाते हॅक होऊ शकते. आपल्या कायम स्मरणात राहण्यासाठी गोपनीय सिक्युरिटी पासवर्ड हा स्वतःसाठी सोपा असावा मात्र; इतरांना मात्र अवघड वाटला पाहिजे.
या वेळी ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, फेसबुकवर मुलींनी आपले फोटो टाकू नयेत, आपला गोपनीय पासवर्ड इतरांना देऊ नये, आपला डेटा सुरक्षित ठेवा, अति गोड बोलणाऱ्यांपासून सावध रहावे, आपल्यावर सायबर हल्ला होण्यास आपणही तितकेच जबाबदार असतो त्यासाठी सदैव काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गरज असेल तेव्हाच इंटरनेट चालू करावे, अनोळखी आणि फेक वेबसाईट्सपासून दूर राहवे. प्रलोभने दाखवणाऱ्या वेबसाइट टाळण्यात अनोळखी ई-मेल वरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. आपणांस कोणताही ई-मेल आल्यास त्वरित सायबर तज्ज्ञांशी संपर्क साधावा. प्रसंगी सायबर पोलिसांत तक्रार नोंदवावी, अशी महत्त्वपूर्ण माहिती देऊन काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला.