समकालीन स्थितीमध्ये माणूस नावाच्या अत्यंत प्रगतशील प्राण्याची वानवा सगळीकडे कमीअधिक प्रमाणात जाणवत आहे. माणसाला त्याचे जगणे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून पार पाडावे लागते. या वयांच्या टप्प्यांवरती त्याला संघर्ष करणे अटळ असते. बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य या प्रत्येक पातळीवरचा संघर्ष वेगवेगळा असतो. आज वार्धक्याच्या प्रवासातील आरोग्य हा विषय अत्यंत गंभीर झाला आहे.
नात्यातील वीण वाढत्या वयाबरोबर अधिक पक्की होणे अपेक्षित असताना सध्याचे चित्र मात्र तसे दिसत नाही. सगळ्यांना धावायचे आहे, यामध्ये नात्यांची अंतयात्रा निघाली तरी हरकत नाही अशी धारणा होताना दिसत आहे. वाढत्या वयाच्या बरोबरीने काही आजार आपल्याशी संगती करू शकतात याची पुरेपूर जाणीव वयोवृद्ध माणसांना होणे अपेक्षित असते. यातील काहींना ते माहिती असले तरी ते त्यासाठी योग्य ती काळजी घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचा आपल्या आप्तस्वकीयांवर गाढ विश्वास असतो. मात्र, एकदा का ते आपल्या आजाराशी झुंजू लागले की मग त्यांना टाळूवरचे लोणी खाणे या प्रकारची जाणीव होते. हातातील वेळ निघून गेल्यामुळे ते काहीच करू शकत नसतात. आलेल्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याची कितीही तयारी असली तरी वेळ आणि शरीर यांचा ताळमेळ घालणे कठीण होऊन जाते. मग काय! येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मरणाची याचना करण्याशिवाय पर्याय नसतो. आपल्या लेकरांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणाऱ्या आई वडिलांची संपत्तीवरून ज्यावेळी पोटची लेकरे वाटणी करतात, त्यावेळी त्यांच्यावर होणाऱ्या आघाताची कल्पना करणे अशक्य आहे.
आजार आणि या अकल्पित चित्रामुळे त्यांना जगण्यापेक्षा मरणं समीप वाटू लागते. कोणीच अमर म्हणून जन्माला येत नाही. सगळ्यांना एक दिवस जायचे आहे. म्हातारपणाचा काही काळ कठीण असतो म्हणून ज्यांच्यामुळे आपण हे जग बघू शकलो त्यांच्या असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे कोणीही वागणे अपेक्षित नसते. या वयामध्ये शरीर, मन, बुद्धी यांचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस कठीण जाते. यामध्ये एखादा आजार सोबतीला असेल तर अधिकच कष्टप्रद जगणे वाट्याला येते. या स्थितीमध्ये सांभाळून घेणारे कोणी असेल तर माणूस कसेही जगतो. विशेषतः जीवनाच्या या टप्प्यावर जोडीदार सोबत असेल तर जगणे सुसह्य होते अन्यथा असह्यतेचा मार्ग अटळ असतो! जगण्याच्या संघर्षात माणूस स्वत:च्या शरीराकडे जाणीवपूर्वक लक्ष देईलच असे नाही. मात्र, काहीही असले तरी म्हातारपण कोणाच्या भरवशावर जगणे कठीण आहे. कारण कधी, कोठे, कसे आपल्या मरणाचा सौदा होईल हे सांगता येत नाही. यासाठी दवाखान्यापेक्षा उत्तम ते ठिकाण कोणते असेल! मात्र, हे दवाखान्यात जाऊन मरण्याचे भाग्यही काहींच्याच वाट्याला येते. कारण तिथे तितकीच माणुसकी शिल्लक असते!
शेवटी, वार्धक्य आनंदाने जगायचे असेल तर आपले इतरांवरील अवलंबित्व कमी करीत म्हातारपणासाठी काही पुंजी ठेवायला हवी. वेळ पडली तर आपली संपत्ती दान करता येईल. मात्र, जिवंतपणी चार चौघांमध्ये स्वत:ची बोली लावून घेण्यापेक्षा आपला हिस्सा बाजूला काढून ठेवणे कधीही चांगले!
श्रीकांत येरूळे